crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

सोलापूर महापौर प्रश्नावर अंतरवाली सराटीत निर्णायक बैठक; मराठा आंदोलनाला मनोज जरांगे पाटील यांचा ठाम इशारा….

अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे मराठा संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक राम भैय्या जाधव यांच्यात सोलापूर महापौर पदाच्या मुद्द्यावर महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. या बैठकीत सोलापूरमधील राजकीय घडामोडी, मराठा समाजावर होत असलेला कथित अन्याय आणि सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.

 

 

बैठकीनंतर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, “सोलापूर महापौर पदाच्या प्रश्नात आम्ही स्वतः लक्ष घालणार आहोत. मराठा आंदोलकांना चुकीच्या पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न झाला, तर मी स्वतः सोलापूरमध्ये येऊन आंदोलनाला पाठिंबा देईन.”
यावेळी आंदोलक राम भैय्या जाधव यांनी सांगितले की, १९९३ पासून गेल्या ३२ वर्षांत विविध समाजांना महापौर पदाची संधी देण्यात आली आहे. मात्र, यंदा मराठा समाजासाठी महापौर पदाची मागणी असतानाही पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे आणि शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी सर्वसाधारण जागा असताना ओबीसी समाजाचा महापौर निवडल्याचा आरोप करण्यात आला.

 

 

 

 

 

या निर्णयाविरोधात मागील ४५ दिवसांपासून मराठा समाजाचे आंदोलन सुरू असून, या आंदोलनाचा परिणाम स्थानिक राजकारणावरही दिसून आला आहे. जिल्हापरिषद निवडणुकीत भाजपच्या ३८ जागांवर मराठा समाजाने प्रभाव टाकत विजयाचा रथ रोखल्याचा दावा आंदोलकांनी केला. तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आंदोलनाचा दबाव वाढल्यानंतर सातारा आणि सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये महत्त्वाच्या पदांवर मराठा समाजाला संधी देण्यात आल्याची माहितीही चर्चेत मांडण्यात आली.

 

 

 

बैठकीच्या शेवटी मनोज जरांगे पाटील यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सत्कार करण्यात आला. या बैठकीमुळे सोलापूर महापौर पदाचा प्रश्न अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पुढील काही दिवसांत आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button