अथर्व जाधव खुन खटला : बाळु काळेंना उच्च न्यायालयात जामीन मंजुर

सोलापूर
अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेले बाळु उर्फ औदूंबर प्रकाश काळे , रा. विजापूर रोड, सोलापूर यांच्या जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमुर्ती श्री. सचिन देशमुख यांच्यासमोर होऊन न्यायमुर्तींनी आरोपी बाळु उर्फ औदुंबर काळे ची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणी हकीकत अशी की, अवैध व्यवसायाच्या आर्थिक हिशोबावरुन आरोपी व त्यांचे भागीदार यांच्यामध्ये वाद उपस्थित झालेला होता. सदरचा वादामुळे आरोपी बाळु काळे हे त्यांचे भागीदारांवरती चिडुन होते. दि. ०४/१०/२०२४ रोजी सायं ५ वाजता बाळु काळे व त्यांचे साथीदारांनी कट केला .
व वाहनांमधून हत्यार घेऊन इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूलचे पाठीमागील मोकळया मैदानातील ऑफिसमध्ये येऊन हिशोबाच्या कागदाची मागणी केली व ऑफिसमधील सर्व साहित्य व हिशोबाच्या नोंद वहया ताब्यात घेऊन साहित्याची तोडफोड केली व ऑफिसमधील कामगारांना मारहाण करण्यास सुरुवात केली व सदर मारहाणीत कामगार अथर्व जाधव यास बांबु ,कुऱ्हाड, कोयता व तलवार अशा शस्त्राने मारहाण करुन त्यास जखमी केले व तो उपचारादरम्यान अश्विनी सहकारी रुग्णालय येथे मरण पावला, असे सरकार पक्षाचे म्हणणे होते.
यातील आरोपी बाळु उर्फ औदूंबर प्रकाश काळे याचा जामीन अर्ज सोलापूर सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर आरोपी बाळू काळे यांनी कोल्हापूर उच्च न्यायालयात ॲड. जयदीप माने यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जाची सुनावणी कोल्हापुर उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती श्री. सचिन देशमुख यांच्यासमोर झाली. जामीन अर्जाच्या सुनावणी वेळी आरोपीचे वकील ॲड. जयदीप माने यांनी आपल्या युक्तिवादामध्ये आरोपीला सदर खटल्यामध्ये खोटेपणाने गुंतवलेले आहे.
अथर्व जाधव याचा मृत्यु हा अपघाती आहे तसे प्रथम नोंदीवरून दिसून येते,असा युक्तिवाद केला. सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायमुर्तींनी आरोपी बाळु काळे याची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणी आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे ॲड. ए. एस. साळगावर यांनी काम पाहिले.



