तत्कालीन सरपंच-चंद्रकांत बंडगर यांचे अपहरण की घातपात ? याबाबत अधिकचा तपास करण्याबाबत सत्र न्यायालयाचा पोलिसाना महत्त्वपूर्ण

तब्बल १६ वर्षानंतर उलघडा होणार का ?
सोलापूर
येथील १) दुर्योधन तुळशीराम बंडगर २) नागनाथ बन्ने व ३) हिरेमठ स्वामी या तिघांनी संगनमत करून चंद्रकांत गुलाब बंडगर यांचे अपहरण केले असे तपासात निष्पन्न झाल्याचे मत नमूद करून सीआयडी पोलीस पुणे यांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले, परंतु चंद्रकांत बंडगर अद्यापही न मिळून आल्यामुळे त्याबाबतचा अधिक तपास करण्याचा आदेश मा. सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते साहेब यांनी पोलिसांना दिला.
यात हकीकत अशी की,
चंद्रकांत गुलाब बंडगर वय ४२, धंदा-तत्कालीन सरपंच, राहणार -परमेश्वर पिंपरी, तालुका-मोहोळ, सोलापूर हे दिनांक २०/०२/२००९ रोजी बेपत्ता झाल्याबाबत फिर्यादी बिभीषन बंडगर यांनी तक्रार दिली होती, तद्नंतर दिनांक २५/०२/२००९ रोजी फिर्यादी याने आरोपी दुर्योधन, नागनाथ व हिरेमठ स्वामी यांनी व्यावसायिक व आर्थिक वादाचे कारणावरून चंद्रकांत यांचे अपहरण करून घातपात केला असल्याची शक्यता असल्याचे नमूद करून मोहोळ पोलिसात आरोपींविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. सदर फिर्यादीच्या अनुषंगाने आरोपीविरुद्ध मोहोळ पोलिसात फक्त अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला. तदनंतर गुण्याकामी आरोपींना अटक करण्यात आली होती. गुन्ह्याचे गांभीर्य पाहता दि.०९/०८/२०११ रोजी सदर गुन्हा हा सीआयडी पुणे यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. तद्नंतर तत्कालीन तपास अधिकारी पोलीस उपअधिक्षक गुन्हे अन्वेषन पथक यांनी सीआयडी पोलिसांनी सदर गुन्ह्याकामी तपास करून चंद्रकांत बंडगर यांचे अपहरण आरोपी यांनीच केले असे तपासात निष्पन्न झाल्याचे नमूद करुन मोहोळ येथील मे. प्रथम वर्ग न्यायादंडाधिकारी यांचे कोर्टात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. परंतु चंद्रकांत बंडगर यांचे पुढे काय झाले, त्यांचा घातपात झाला की काय?, याबाबत कोणताच तपास केल्याचे दोषरोप पत्रातून दिसून येत नव्हते. सदर दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर व्यतिथ होऊन फिर्यादीने प्रथमतः मोहोळ येथील मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात प्रकरणाचा अधिक तपास करण्याबाबत पोलिसांना आदेश करावा याबाबत अर्ज केला होता, परंतु मोहोळ येथील मे. कोर्टाने फिर्यादीचा अर्ज फेटाळला. फिर्यादीचा अर्ज फेटाळल्यानंतर फिर्यादीने अॅड. प्रशांत नवगिरे यांच्यामार्फत मा.सत्र न्यायालय सोलापूर येथे पुर्नविलोकन याचिका दाखल केली. फिर्यादीतर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की, “सीआयडी पोलिसांच्या तपासाप्रमाणे आरोपीनींच चंद्रकांत याचे अपहरण केले, परंतु चंद्रकांत याचे पुढे काय झाले, ते आद्याप मिळून आलेले नाही, त्याचा घातपात केला की काय? याबाबतचा कोणता तपास दोषारोप पत्रात दिसून येत नाही., त्यामुळे चंद्रकांत मागील पंधरा वर्षापासून सापडून येत नसल्यामुळे त्यांचा घातपात झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच चंद्रकांत हे अपहरणापूर्वी राजाराम दुधाळ यांच्याबरोबर गेले होते, राजाराम दुधाळ यांच्याबाबत कोणताही तपास झालेल्या दिसून येत नाही, तपासाच्या अनुषंगाने आरोपींची, राजाराम दुधाळ यांची सीडीआर, टॉवर लोकेशन व इतर व्यक्तीकडे तपास होणे गरजेचे आहे, त्याशिवाय वस्तुस्थिती न्यायालयासमोर येणार नाही व फिर्यादीस न्याय मिळणार नाही” सदरचा युक्तिवाद ऐकून व मान्य करून मा. सत्र न्यायाधीश श्री जयदीप मोहिते यांनी आदेश पारित केला. आदेशात मे. कोर्टाने नमूद केले की, “तपासाकामी चंद्रकांत जिवंत अथवा मृत सापडले नाही, पोलीसांनी अर्धवट व सद्सदविवेक बुध्दीस न पटणारे दोषारोप पत्र दाखल केले असून, सविस्तर तपास होणे गरजेचे आहे” असे मत नोंदवून प्रकरणात अधिकचा सविस्तर तपास करण्याचा आदेश मोहोळ पोलीसांना दिले.
यात फिर्यादीतर्फे अॅड. प्रशांत नवगिरे, अॅड, सिद्धाराम पाटील व अॅड, चेतन रणदिवे तर आरोपी तर्फे अॅड.राम कदम, अॅड. अनिल मुसळे यांनी काम पाहिले सरकार तर्फे अॅड. दत्तूसिंग पवार यांनी काम पहिले.



