इंडी शहरात एका व्यक्तीवर तलवारीने हल्ला, हात तुटला

विजयपूर /दिपक शिंत्रे
.
विजयपूर
जिल्ह्यातील इंडी शहरातील अंजुमन गल्लीत एका व्यक्तीवर अज्ञात हल्लेखोरांच्या टोळीने तलवारीने भीषण हल्ला केल्याची घटना काल रात्री घडली आहे.
या हल्ल्यात मारुती क्षत्री हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या डाव्या हातावर झालेल्या वारामुळे हात तुटल्याची माहिती समोर आली आहे. मारुती हे माजी सैनिक असून, इंडी शहरातील डीएसपी कार्यालयाजवळ मोबाईलचे दुकान चालवत होते, असे सांगितले जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, जुन्या वैमनस्यातून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, मारुती हे सावकारीचा व्यवसाय करत असल्याची माहितीही समोर आली असून, हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच इंडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जखमी मारुती क्षत्री यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला असून, प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.



