मराठा समाजाला मंत्रिपद निश्चित – मंत्री एम. बी. पाटील

विजयपूर/ दिपक शिंत्रे
विजयपूर
नूतन मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात मराठा समाजातील किमान एका व्यक्तीला तरी मंत्रिपद निश्चितपणे मिळेल, असा मला विश्वास आहे,” असे राज्याचे मोठे व मध्यम उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी सांगितले.
विजयपूर शहरातील के.के.एम.पी. समाज भवन येथे कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेतर्फे आयोजित जिल्हास्तरीय मराठा समाज मेळावा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९९ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, “स्वाभिमानी मराठा समाजाला नव्या मंत्रिमंडळात श्रीनिवास माने किंवा संतोष लाड यांना मंत्रिपद मिळणार यात शंका नाही. विजयपूर जिल्ह्याच्या राजकारणात मराठा समाजातील नेत्यांचे मोठे योगदान राहिले आहे.”
माजी मंत्री शिवानंद पाटील यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले
बेंगळुरू येथील गोसाई मठाचे मंजनाथ भारती स्वामीजी म्हणाले, “मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारमध्ये श्रीनिवास माने आणि संतोष लाड या दोघांनाही मंत्रिपद मिळाले पाहिजे. राज्यातील सुमारे ४० विधानसभा मतदारसंघांमध्ये मराठा समाजाची निर्णायक भूमिका आहे.”
यावेळी प्राचार्य मंजनाथ जनगोंड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर विशेष व्याख्यान दिले. तसेच मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेच्या वतीने शिष्यवृत्ती देऊन सत्कार करण्यात आला.
कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेचे राज्याध्यक्ष सुरेशराव साठे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात एस. आर. सिंध्या, टी. आर. सुनील चव्हाण, टी. आर. वेंकटराव चव्हाण, राज्यसभा सदस्य नारायणसा भांडगे, उमेश कारजोल, विजयकुमार घाटगे, विजयकुमार चव्हाण, शंकर कणसे, बाबुराव तरसे, ज्योतिबा चव्हाण, सुधाकर घाटगे, ज्योतिराम पवार, जिल्हाध्यक्ष भीमाशंकर शिवाळकर, रामू जाधव, रामू जगताप, रमेश गायकवाड, बाळासाहेब चिनकेकर, रामण्णा भोसले आणि इतर मान्यवर उपस्थित होते.



