पप्पा मला सोडून गेला…; सरवदे कुटुंबाच्या दुःखाने अमित ठाकरे भावूक…
फडणवीस–शिंदेंनी या कुटुंबाची अवस्था पाहावी – अमित ठाकरे...

सोलापूर, प्रतिनिधी
मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी रविवारी (४ जानेवारी) दिवंगत मनसैनिक बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबाची सोलापुरात सांत्वनपर भेट घेतली. यावेळी सरवदे यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश पाहून वातावरण अत्यंत भावनिक झाले. पप्पा मला सोडून गेला असे म्हणत त्यांच्या मुलींनी टाहो फोडताच अमित ठाकरे यांनाही अश्रू अनावर झाले. यावेळी अमित ठाकरेंनी बाळासाहेब सरवदे यांच्या मुलींचा हातात हात घेतल्याचा भाऊक क्षण पाहायला मिळाला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, या मुलींना पाहून मला माझ्या मुलाची आठवण झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या कुटुंबाची परिस्थिती पाहिली पाहिजे. निवडणुकांसाठी जर अशा प्रकारे खून होत असतील, तर आम्ही सर्व उमेदवारी अर्ज माघे घेऊ; तुम्हीच जिंका. विकास नसलातरी चालेल, पण खून होता कामा नयेत, असा तीव्र संताप त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांना उद्देशून अमित ठाकरे म्हणाले, “एक दिवस प्रचार बाजूला ठेवा आणि बाळासाहेब सरवदे यांच्या घरी भेट द्या.
निवडणुका कोणत्या पातळीला नेऊन ठेवल्या आहेत, हे तुम्हाला समजेल. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मला दहा मिनिटे वेळ द्यावा. सोलापुरातील संपूर्ण परिस्थिती मी त्यांच्यासमोर मांडू इच्छितो, असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी आपण पोलिस आयुक्तांना न भेटता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे अमित ठाकरे यांनी सांगितले.
सरवदे यांच्या आई, पत्नी आणि मुली अस्थी विसर्जन करून परतल्या असून “कशासाठी निवडणुका घ्यायच्या?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. या भेटीदरम्यान उपस्थित नागरिकांनी सरवदे कुटुंबाला न्याय मिळावा, अशी जोरदार मागणी केली. यावेळी अमित ठाकरे यांनी न्याय नक्कीच मिळेल असा विश्वास व्यक्त केला.



