“सोलापूरमध्ये बेवारस वाहन हटाव मोहीम सुरू – 487 वाहन मालकांना नोटिसा, दहा हजारांचा दंड व लिलावाची चेतावणी”

सोलापूर – मा. आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे (सोलापूर महानगरपालिका) तसेच मा. पोलीस आयुक्त श्री. एम. राजकुमार (सोलापूर शहर) यांच्या आदेशानुसार, शहरातील रस्त्याच्या कडेला महिनोमहिने उभी असलेली बेवारस, गंजलेली आणि वाहतुकीस अडथळा ठरणारी,अस्वच्छता निर्माण करणारी वाहने , व तसम साहित्य हटविण्याची संयुक्त मोहीम महानगरपालिका आणि वाहतूक पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हाती घेण्यात आली आहे.
शहरातील रस्त्यांच्या कडेला आणि मोकळ्या जागांमध्ये उभी असलेली वाहने यासंदर्भात महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षकांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले असून त्यानुसार खालीलप्रमाणे आकडेवारी नोंदविण्यात आली आहे:चारचाकी वाहने : 102,दुचाकी वाहने : 37,तीनचाकी वाहने : 39,ट्रक : 5
डंपर : 1,इतर साहित्य : 303
एकूण – 487
या सर्व वाहनमालकांना व साहित्य धारकांना नोटीस बजावण्यात आली आहे.
यासंदर्भात या आधीच वर्तमानपत्रात जाहीर प्रसिद्धीकरण देण्यात आले आहे.आज दुपारी 4.00 वाजेनंतर, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या नियंत्रणाखाली या कारवाईची सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात रेल्वे स्टेशन रोडवरील ‘लावण्या रंग ट्रॅव्हल्स’ बेवारस वाहन उचलण्यात आले असून, ते वाहतूक पोलीस विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदर कारवाईमुळे शहरातील रस्ते मोकळे होऊन वाहतूक व्यवस्था सुधारेल तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेत वाढ होईल. रस्ते मोकळे झाल्याने तेथील स्वच्छता करणे सुलभ होणार आहे व एकंदरच शहरवासीय तसेच शहरांमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांमध्ये शहर स्वच्छ सुंदर असल्याबाबत भावना निर्माण होणार आहे .या कारवाईमुळे अशा शासकीय जागेवर बेवारस अवस्थेत लावलेल्या वाहनांच्या खाजगी मालकांमध्ये जागृतीसह एक प्रकारची धास्ती निर्माण झालेली आहे.

महानगरपालिकेचा इशारा:
रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी खाजगी वाहन बेकायदेशीररीत्या उभे ठेवणाऱ्यांवर पुढीलप्रमाणे कठोर कारवाई केली जाईल –वाहन सोडवण्यासाठी ₹१०,००० दंड आणि टोविंग खर्च आकारण्यात येईल.
एक महिन्याच्या आत वाहन सोडवले नाही तर, ते जप्त करून लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात येईल.आगामी काळात या मोहिमेला अधिक गती देण्यात येणार असून, शहरातील सर्व मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठा व वसाहती परिसरात ही कारवाई सातत्याने चालवली जाईल.सोलापूर महानगरपालिका व वाहतूक पोलीस विभाग यांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सार्वजनिक ठिकाणी ठेवलेली आपली खाजगी वाहने तात्काळ आपल्या मालकीच्या जागेत हलवावीत, अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात अशी माहिती अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी दिली .



