राष्ट्रीय स्वयंसेवक संघात देशातील प्रत्येक जातीचे प्रतिनिधित्व
रमेश पांडव : पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघ शिक्षा वर्गाचा समारोप

सोलापूर, दिनांक ३० मे :
“देशातील प्रत्येक जातीचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघात असून, पहिल्या टप्प्यात भूमीपुत्र असणाऱ्या हिंदू समाजाला राष्ट्रीय बनवावे लागेल. त्यानंतर मुस्लिम आणि ख्रिश्चनांनाही आम्हाला राष्ट्रीय बनवायचे आहे,” असे प्रतिपादन सामाजिक समरसता गतीविधीचे अखिल भारतीय मंडळ सदस्य रमेश पांडव यांनी केले.

येथील हरिभाई देवकरण प्रशालेत आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या संघ शिक्षा वर्गाचा समारोप सोहळ्या प्रसंगी रमेश पांडव बोलत होते. व्यासपीठावर रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे विभागीय अध्यक्ष संजीव पाटील, महापौर विनायक कोंड्याल, वर्गाचे सर्वाधिकारी शशिकांत फिरंगे, शहर संघचालक राजेंद्र काटवे आणि वर्ग कार्यवाह प्रशांत सहस्त्रबुद्धे उपस्थित होते. प्रारंभी भारतमाता आणि संत रविदास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
श्री. पांडव म्हणाले, “संघ कोणाचीही मूळ परंपरा किंवा ओळख न बदलता सर्वांना राष्ट्रीय बनवतो. संघात जैन, बौद्ध, कबीरपंथी, महानुभाव, वैदिक सगळे येतात आणि देशहिताचा विचार करतात. संघाच्या शाखेत भगवा झेंडा, शिवरायांचा फोटो असतो; तिथे गाणी, खेळ, भाषणे होतात. शाखेत ‘देशभक्त कार्यकर्ता निर्माणाचे कार्य होते.”
बेसावध अवस्थेतील हिंदू समाजाचे लचके तोडले जात आहेत. म्हणून समाजातील प्रत्येक स्त्री-पुरुषाने शस्त्राचे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. हिंदू समाजाने आता स्वतःचे बलस्थान जागृत करून संघटित झाले पाहिजे, असे मत पांडव यांनी व्यक्त केले.

संजीव पाटील म्हणाले, “संघाला समाज मान्यता व त्यागाची परंपरा लाभली आहे. मन, मनगट आणि मेंदू मजबूत करण्याचे काम या संघ शिक्षा वर्गातून झाले आहे. इथल्या प्रशिक्षणातून घडलेले स्वयंसेवक पुढे शिक्षण, समाजकार्य आणि राजकारणात देशाचे नेतृत्व करतील. चांगला माणूस घडविण्याचे काम संघ करत आहे.” शासकीय सात जिल्ह्यांतील २१३ स्वयंसेवकांनी वर्गात सहभाग घेतला; ज्यामध्ये शेतकरी, व्यावसायिकांसह नोकरदारही होते. समारोप कार्यक्रमात दंड, नियुद्ध, समता, योगासन, घोष यांचे शिस्तबद्ध सादरीकरण स्वयंसेवकांनी केले. १५ मे ते ३० मे या काळात हा वर्ग आयोजित करण्यात आला होता. सोलापूर जिल्हा सहकार्यवाह संजीव सिद्धूल यांनी आभार मानले.
———

चौकट १
रा. स्व. संघाचा आरक्षणाला पाठिंबा
पांडव म्हणाले, “उपेक्षित, वंचित आणि अनुसूचित जाती-जमातींच्या घटकांना समाजजीवनात सहभाग मिळणे आवश्यक होते. आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व, या धर्तीवर सर्वांना सहभाग मिळाला आहे. या घटकाला जवळ करून मुख्य प्रवाहात आणले, तर राष्ट्राची प्रगती होते. हा घटक गेली हजार वर्षे पिछाडीला पडला होता. ‘जोपर्यंत आरक्षण घेणारा स्वतःहून आरक्षण नाकारणार नाही, तोपर्यंत आरक्षणाला पाठिंबा असेल,’ असे संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी म्हटले आहे.”
——–
चौकट २
डॉ. आंबेडकरांच्या डोळ्यासमोर हिंदू समाजच होता !
“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानासोबत ‘हिंदू कोड बिल’ही लिहिले. हे बिल पास करण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी अत्यंत आग्रह धरला होता. त्यांचे मित्र किचनेर यांना लिहिलेल्या पत्रात डॉ. बाबासाहेबांनी नमूद केले होते की, ‘हिंदू कोड बिल हे या देशाच्या दृष्टीने संविधानापेक्षा १०० पट अधिक महत्त्वाचे आहे.’ म्हणजेच, जो कोणी या समाजात काम करतो, त्याच्या डोळ्यासमोर हिंदू समाजच असतो. संघाने हिंदू, हिंदुत्व, हिंदू राष्ट्र हे शब्द स्वतःचे नाहीत, ते परंपरेतच आहेत; संघ फक्त त्याचे स्पष्टीकरण देतो,” असे रमेश पांडव यांनी सांगितले.
————-
फोटो ओळ –
१) व्यासपीठ –
हरिभाई देवकरण प्रशाला, सोलापूर : समारोप कार्यक्रमात बोलताना रमेश पांडव, यावेळी (डावीकडून) प्रशांत सहस्त्रबुद्धे, महापौर विनायक कोंड्याल, शशिकांत फिरंगे, संजीव पाटील, राजेंद्र काटवे आणि रमेश पांडव.
—
२) प्रात्यक्षिक सादर करताना स्वयंसेवक
———–



