वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा धर्मादाय संस्थांना पुढे येण्याचे आवाहन…

सोलापूर
दि. १६ :
महाराष्ट्राच्या संतपरंपरेचे आणि अखंड भक्तीचे प्रतीक असलेल्या आषाढी वारीसाठी यंदा पंढरपूरमध्ये सुमारे २५ ते ३० लाख वारकरी व भाविक दाखल होण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या निवास, अन्न, पिण्याचे पाणी, आरोग्यसेवा व इतर मूलभूत सुविधांसाठी सर्व धर्मादाय संस्था, सार्वजनिक न्यास, देवस्थाने आणि धर्मादाय रुग्णालयांनी सेवाभावी उपक्रम राबवावेत, असे भावनिक आवाहन सोलापूर विभागाचे धर्मादाय उप आयुक्त ईश्वर सूर्यवंशी यांनी केले आहे.
आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक ऐक्याची जिवंत परंपरा असून राज्यासह देशभरातून लाखो वारकरी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पायी पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. या लाखो भाविकांना सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
त्यांनी सांगितले की, पालखी मार्गावरील तसेच पंढरपूर शहरातील धर्मादाय संस्था, सार्वजनिक न्यास आणि देवस्थानांनी महाप्रसाद, स्वच्छ पिण्याचे पाणी, विश्रांती केंद्रे, स्वच्छतागृहे आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. ज्या संस्थांकडे स्वतःच्या इमारती, सभागृहे किंवा मोकळ्या जागा उपलब्ध आहेत, त्यांनी त्या वारकऱ्यांच्या निवास व विश्रांतीसाठी खुल्या कराव्यात. विशेषतः पंढरपूरमधील सार्वजनिक न्यासांनी या सेवाकार्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी नमूद केले.
धर्मादाय रुग्णालयांनी पालखी मार्ग, दिंड्यांचे मुक्काम तसेच पंढरपूर परिसरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकासह मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिरे आयोजित करावीत. वारकऱ्यांना वेळेवर वैद्यकीय मदत उपलब्ध झाल्यास उष्माघात, निर्जलीकरण, संसर्गजन्य आजार तसेच इतर आरोग्यविषयक अडचणी टाळण्यास मोठी मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सूर्यवंशी म्हणाले, “आषाढी वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून मानवसेवेची सुवर्णसंधी आहे. वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा, या भावनेतून प्रत्येक धर्मादाय संस्था, सामाजिक संघटना, सार्वजनिक न्यास, देवस्थान आणि धर्मादाय रुग्णालयाने पुढाकार घेऊन सेवाभावाचे दर्शन घडवावे.”
आषाढी वारीच्या निमित्ताने प्रशासनाबरोबरच समाजातील विविध सेवाभावी संस्थांनी एकत्रितपणे पुढाकार घेतल्यास लाखो वारकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील आणि महाराष्ट्राच्या सेवाभावी परंपरेला अधिक बळ मिळेल, असा विश्वासही धर्मादाय उप आयुक्त ईश्वर सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.



