अपघाती मृत्यूला निमंत्रण देणारे शहरातील बंद सिग्नल,बंद सीसी टीव्ही कॅमेरे तातडीने चालू करा महामार्गाच्या धर्तीवर गतिरोधक बसवा :-कॉ.नरसय्या आडम मास्तर…

सोलापूर
दिनांक – शहरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण ही आहे. यामुळे अनियंत्रित व बेजबाबदार वाहतुकीचे प्रमाण वाढलेले आहे. याचे प्रमुख कारण स्मार्ट सिटी व विकसनशील शहरातील निकषाप्रमाणे रस्त्यांची गुणवत्ता, दर्जा नाही. राज्यमार्ग व राष्ट्रीय महामार्गांचे शहरांतर्गत मुख्य रस्त्यांना जोडल्यानंतर केल्या जाणाऱ्या वाहतुकीच्या नियमांचे चिन्हांकन व निर्देशाचे फलक बऱ्याच ठिकाणी दिसत नाहीत. सर्वात महत्वाचे म्हणजे वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी रस्त्यातील दुभाजकांची दुरावस्था, आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधकाच्या नियमाप्रमाणे गतिरोधकांचा अभाव, चौकाचौकातील बंद अवस्थेतील सिग्नल, बंद अवस्थेतील सीसीटीव्ही या सर्व बाबींमध्ये समन्वयाचा अभाव यामुळे शहरात अपघात व अपघाती मृत्यूची मालिका अद्याप सुरूच आहे.अशी चिंता माकपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केली.
शुक्रवार दिनांक 24 जानेवारी रोजी सोलापूर महानगर पालिका आयुक्त तथा प्रशासक शीतल तेली उगले यांना ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात माकप चे जिल्हा सचिव ॲड एम एच शेख, कॉ युसुफ शेख मेजर , ॲड.अनिल वासम, कॉ विल्यम ससाणे, कॉ.दाउद शेख, कॉ.नरेश दुगाणे, आदींची उपस्थिती होती.
या निवेदनामार्फत शहरांतर्गत जड वाहतुकीमुळे होत असलेली जीवित हानी, वित्त हानी टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन, वाहतूक शाखेकडून वाहनांची वैधता, वेग, कागदपत्रे आदींची तपासणी करण्यात यावी. महामार्गावरील गतिरोधकाप्रमाणे गतीरोधक बसविण्यात यावे, बंद असलेले सिग्नल, बंद असलेले सीसीटीव्ही तात्काळ चालू करावे. तसेच हैद्राबाद रोड व अक्कलकोट रोड मार्गे शांती चौक ते गुरुनानक चौक या नागरिकांच्या प्रचंड वर्दळीच्या मार्गावरून होत असलेली जड वाहतूक, माल वाहतूक कायमस्वरूपी बंद करून याला उपलब्ध असणाऱ्या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा व त्यास बाह्य वळण द्यावे अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली.