धक्कादायक बातमी : सोलापुरातून ३१० दिवसांत तब्बल २३५ जण बेपत्ता! त्यापैकी १२३ महिला व युवती !
पोलिसांकडून विशेष पथकाची नेमणूक

सोलापूर
सोलापूर शहर व जिल्ह्यात वाढत्या बेपत्ता प्रकरणांनी प्रशासनाची झोप उडवली आहे. गेल्या ३१० दिवसांत तब्बल २३५ नागरिक बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये १२३ महिला आणि युवतींचा समावेश असून, या आकड्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही प्रकरणांमध्ये घरगुती व वैयक्तिक कारणांमुळे घर सोडून गेलेले असून, अनेक प्रकरणांमध्ये मात्र व्यक्तींचा ठावठिकाणा अद्याप सापडलेला नाही.

अल्पवयीन मुली, तरुण व वृद्ध नागरिकांचीही संख्या लक्षणीय असल्याने समाजातील सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथक नेमले आहे. मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फूटेज आणि इतर तांत्रिक साधनांचा वापर करून शोधमोहीम सुरू आहे.
दरम्यान, नागरिकांमध्ये वाढत्या घटनांमुळे भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



