राजकीय वादातून खूनप्रकरण: मुख्य आरोपी शालन शिंदेंचा जामीन अर्ज फेटाळला….

सोलापूर
राजकीय वैमनस्यातून झालेल्या खूनप्रकरणात न्यायालयाने कठोर भूमिका घेत, मुख्य आरोपी असलेल्या महिलेचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. या निर्णयामुळे प्रकरणाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे.
सदर प्रकरणाची सविस्तर हकीकत अशी की, दि. ०२ जानेवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास आरोपी शालन शंकर शिंदे व इतरांनी फिर्यादीच्या घरी जाऊन अपक्ष उमेदवारी अर्ज काढून घेण्याच्या कारणावरून दमदाटी केली. त्यानंतर सायंकाळी सुमारे ४.४५ वाजता फिर्यादी, त्यांचा भाऊ बाळासाहेब सरवदे (मयत) आणि पुतण्या आदित्य सरवदे हे आरोपी शंकर शिंदे यांच्या घराजवळ असताना वाद पुन्हा उफाळला.
यावेळी आरोपींच्या कुटुंबीयांनी “आम्ही जिंकलो” असे ओरडत फिर्यादीशी वाद घातला. हा वाद पुढे हिंसक स्वरूप धारण करत आरोपींनी एकत्र येऊन तलवार व कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांनी हल्ला केला. तानाजी शिंदे व विशाल शिंदे यांनी बाळासाहेब सरवदे यांच्या छातीवर तलवारीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच इतर आरोपींनी लाथाबुक्यांनी मारहाण करत जीवघेणा हल्ला केला.
या हल्ल्यात बाळासाहेब सरवदे यांचा मृत्यू झाला असून फिर्यादी व साक्षीदार देखील जखमी झाले आहेत. या प्रकरणी गुन्हा क्रमांक ०५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध गंभीर कलमांसह आर्म अॅक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपी शालन शिंदे हिने जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, जिल्हा सरकारी वकील डॉ. प्रदीपसिंग राजपूत यांनी यास तीव्र विरोध करत, हा गुन्हा अत्यंत गंभीर असून ठोस पुरावे, १० प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि वैद्यकीय पुरावे उपलब्ध असल्याचे न्यायालयासमोर मांडले. तसेच आरोपीला जामीन दिल्यास साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. पी.पी. राजवैद्य यांनी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे डॉ. प्रदीपसिंग राजपूत यांनी काम पाहिले, तर आरोपीतर्फे अॅड. न्हावकर यांनी बाजू मांडली.



