solapur

स्वामी विवेकानंदांनी जगाला भारतीय संस्कृतीची आणि तत्त्वज्ञानाची ओळख करून दिली – स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचे विचार

एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठात स्वामी विवेकानंदांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण

 

सोलापूर, ७ मार्च

 

 

‘१८९३ साली स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय धर्मपरिषदेत केलेल्या ऐतिहासिक भाषणामुळे संपूर्ण जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. भारत हा ज्ञानाचे भांडार असलेला आणि वैभवसंपन्न देश आहे, याची जाणीव जगाला झाली. याच घटनेतून भारताच्या पुनरुत्थानाची मुहूर्तमेढ रोवली गेली,’ असे मत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी व्यक्त केले. एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठांमध्ये स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्याला श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सह-अध्यक्ष सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

 

 

 

 

 

याप्रसंगी माईर्स एमआयटी संस्थेच्या विश्वस्त व महासचिव आणि एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या कार्यकारी अध्यक्षा प्रा. स्वाती कराड चाटे, विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू प्रा. गोपाळकृष्ण जोशी, कुलसचिव प्राणेश मुरनाळ, सौ. उषा विश्वनाथ कराड, संचालक स्ट्रॅटजी अँड ऑपरेशन्स राघवेंद्र एम. चाटे, सिद्धेश्वर देवस्थानच पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुष्पराज काडादी, सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे, चार्टर्ड अकाऊंटंट राज मिणियार, सोलापूर आर्किटेक्चर असोसिएशनचे असिम सिंदकी, कायझन होंडाचे संचालक सुरेन्द्र शिरकोळे आणि सोलापुरातील मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

 

पुढे बोलताना स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले, “देशाच्या माननीय पंतप्रधानांनी आपल्या भाषणात पुढील दहा वर्षात आपण आपल्या देशाच्या गुलामगिरीच्या सर्व खुणा पुसून टाकण्याचा संकल्प करण्याचे आहावन केले. परंतु स्वातंत्र्यानंतर तसे कार्य करण्याची प्रेरणा कोणी दिली असेल तर ती स्वामी विवेकानंदांनी दिली आणि त्या गुलामगिरीच्या खुणा पुसण्याचे काम ज्या प्रकारे एमआयटीमध्ये प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्याकडून होत आहे ते पाहून स्तिमित व्हायला होत.” असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले.

 

 

 

 

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, “सत्ता, संपत्ती आणि कीर्ती पंचवण्यासाठी अध्यात्माचे बळ लागते आणि ते प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या वारकरी तत्वज्ञानाचा अंगीकार करत मूल्य शिक्षणाचा वारसा उभा केला.

 

 

 

आपल्या अध्यक्षीय भाषणात एमआयटी समुहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले की, “ग्रामदैवत सिध्दरामेश्वराच्या भूमीत स्वामी विवेकानंद यांचा पुतळा उभारणी हा एक योग अभुतपूर्व आहे. सध्याच्या परिस्थितीत जगाला संताच्या विश्वात्मके देवाच्या प्रार्थनेची गरज आहे.” युनेस्कोमध्ये संत ज्ञानेश्वरांची विश्वकल्याणाचे पसायदान प्रार्थना पोहोचवता आल्याचे समाधान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

 

 

याप्रसंगी बोलताना एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या कार्यकारी अध्यक्षा प्रा. स्वाती कराड चाटे यांनी “वर्गामध्ये विषयाचे ज्ञान घेणे जसे आवश्यक आहे तसेच वर्गाच्या बाहेरही विद्यार्थ्यांना देशात होऊन गेलेल्या थोर महापुरुषांची महती समजावी आणि त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी आणि त्यांचे व्यक्तिमत्व घडावे हे या संस्थेचे नेहमीच ध्येय राहिले आहे.

 

 

 

 

विद्यापीठामध्ये उभारण्यात आलेला हा स्वामी विवेकानंदांचा पुतळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारा ठरेल.” असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंडित भिमण्णा जाधव यांचे सुंद्री वादन झाले. एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. गोपाळकृष्ण जोशी यांनी प्रास्ताविक केले तर कुलसचिव प्राणेश मुरनाळ यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, विद्यापीठाचे अधिष्ठाता, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button