मानाच्या ‘कार्मिक, कायदा व न्याय’ समितीवर खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे
पहिल्याच बैठकीत रेल्वे भरती प्रक्रियेवर रोखठोक भूमिका; AIसह तंत्रज्ञानाच्या वापराची मागणी

नवी दिल्ली / सोलापूर
शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे यांची संसदेच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठित ‘कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, कायदा आणि न्याय’ या संसदीय स्थायी समितीवर सदस्य म्हणून निवड झाली आहे. या समितीवर निवड झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच बैठकीत त्यांनी रेल्वे भरती प्रक्रियेतील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर रोखठोक भूमिका मांडत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. रेल्वेतील भरती प्रक्रियेचा आढावा घेताना डॉ. वाघमारे यांनी SC, ST, OBC आणि दिव्यांग उमेदवारांचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला बॅकलॉग तातडीने भरावा, तसेच भरती प्रक्रियेत महिलांचे प्रमाण वाढवावे, अशी जोरदार मागणी केली.
भरती परीक्षांमधील पेपर लीक आणि अन्य गैरप्रकारांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर व प्रशासकीय उपाययोजना करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. बदलत्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे भरती परीक्षेचा अभ्यासक्रम अद्ययावत करण्यासोबतच भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, वेगवान आणि विश्वासार्ह करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली.
या बैठकीला समितीचे अध्यक्ष खासदार ब्रिजलाल, सदस्य खासदार ए. राजा, लालजी वर्मा, वरुण चौधरी, अनूप चक्रवर्ती यांच्यासह अन्य खासदार व रेल्वे भरती मंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, राज्यसभा खासदार झाल्यानंतर डॉ. वाघमारे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील महात्मा ज्योतिबा फुले जन्मशताब्दी समिती, केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण सल्लागार समिती आणि आता ‘कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, कायदा आणि न्याय’ या स्थायी समितीवर निवड झाली आहे. महत्त्वाच्या समित्यांवरील या सलग निवडीमुळे त्यांच्या अभ्यासू नेतृत्वाची आणि लोकहिताच्या प्रश्नांवरील सक्रिय भूमिकेची दखल घेतली जात असल्याचे मानले जात आहे.



