india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

मी कोणाच्या वाट्याला जात नाही, छेडाल तर उत्तर देईन:- पालकमंत्री जयकुमार गोरे…

श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालापात पालकमंत्री जयकुमार गोरे यांची रोखठोक भूमिका

 

 

विमानतळ, टेक्सटाईल पार्क, घरकुल, बीओटीसह विविध विषयांवर भाष्य

त्या १८ गुन्ह्यांपैकी १५ प्रकरणांत निर्दोषत्व सिद्ध

सोलापूर : सोलापूरच्या विकासाचे रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन पातळीवर सातत्याने पाठपुरावा सुरू असून, विमानसेवा, टेक्सटाईल पार्क, आयटी पार्क, एमआयडीसी विस्तार, पायाभूत सुविधा आणि पर्यटन विकासाला प्राधान्य दिले जात आहे. विकासाच्या प्रश्नांवर राजकारण न करता सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज असल्याची भूमिका पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मांडली.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित सत्कार व वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, नगरसेवक मनीष केत, संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे उपस्थित होते. प्रास्ताविक विक्रम खेलबुडे यांनी केले.

 

पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, पालकमंत्री म्हणून १८ महिने पूर्ण झाले असून, समांतर जलवाहिनी, विमानसेवा, उड्डाणपूल, टेक्सटाईल पार्क यांसारखे अनेक प्रश्न पुढे आले. टेक्सटाईल पार्कचा प्रश्न मार्गी लागल्याने सुमारे १० हजार कुटुंबांना फायदा होणार आहे. सोलापूरची गुंतवणूक वाढविण्यासाठी एमआयडीसीचा विस्तार, आयटी पार्क आणि वस्त्रोद्योगाला नव्या सवलती देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बोरामणी विमानतळाच्या प्रश्नावर बोलताना विद्यमान विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी ८०० ते १ हजार कोटी, तर बोरामणीसाठी सुमारे ६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत. माळढोक पक्ष्याच्या अस्तित्वाबाबत वन विभागाचा अहवालही महत्त्वाचा ठरणार असून, विमानतळाबाबत सरकार तातडीने निर्णय घेण्याच्या विचारात असल्याचे ते म्हणाले.

 

 

 

आदिला नदीच्या ब्लू व रेड लाईनच्या प्रश्नावर नागरिकांना दिलासा देताना, एकाही घरावर हातोडा पडू देणार नाही मात्र नव्याने बांधकाम करताना काळजी घ्यावी. नदी-नाल्याचा प्रश्न सोडवून शहराचा विकास करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.महापालिकेच्या सात जागा बीओटीवर विकसित करण्याच्या प्रस्तावाचे समर्थन करताना, निष्क्रिय जागांचा विकास करून महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याची गरज आहे.काम होण्याआधी ते कायदेशीर की बेकायदेशीर ठरविण्याचा अधिकार कोणाला? असा सवालही त्यांनी केला.
प्रधानमंत्री आवास योजनेत महाराष्ट्रात एका वर्षात साडेपाच लाख घरे पूर्ण झाली असून, आता १५ लाख घरांचे उद्दिष्ट असल्याचे गोरे यांनी सांगितले. सोलापूरसह राज्यातील महिलांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद मॉल उभारले जाणार असून, पहिल्या टप्प्यात १३ मॉलचे काम सुरू होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविक अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी केले. सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती पत्रकार समितीचे
सदस्य प्रमोद बोडके यांनी केले. आभार सरचिटणीस सागर सुरवसे यांनी मानले.

वार्तालापातील ठळक मुद्दे असे—

– बोरामणी विमानतळासाठी सुमारे ६०० कोटींचा पर्याय, निर्णयासाठी सरकार सकारात्मक.
– आदिला नदीच्या प्रश्नावर एकाही घरावर हातोडा पडू देणार नाही.
– सात महापालिका जागा बीओटीवर विकसित करण्याच्या प्रस्तावाचे समर्थन.
– प्रधानमंत्री आवास योजनेत १५ लाख घरांचे उद्दिष्ट.
– महिलांसाठी राज्यात टप्प्याटप्प्याने उमेद मॉल उभारणार.
– सोलापूरच्या विकासासाठी एमआयडीसी, आयटी पार्क व वस्त्रोद्योग विस्तारावर भर.

 

दोषींवर कारवाई, निर्दोषांना संरक्षण

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ३८ संस्थांच्या चौकशीबाबत गोरे म्हणाले, दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करून पैसे वसूल केले जातील; मात्र निर्दोषांवर कारवाई होणार नाही. दोषी व्यक्तींच्या सोबत आम्ही निवडणूक लढणार नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले.

विनाकारण छेडू नका, उत्तर
द्यायलाही कमी पडणार नाही

स्वतःवरील आरोपांवर गोरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. आपल्यावर दाखल १८ गुन्ह्यांपैकी १५ प्रकरणांत निर्दोषत्व सिद्ध झाल्याचे सांगत, उर्वरित तीन प्रकरणांचा न्यायालयीन निकाल स्वीकारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मी कोणाच्या वाट्याला जात नाही; मात्र विनाकारण छेडले तर उत्तर द्यायलाही कमी पडणार नाही,असा इशारा त्यांनी दिला.

ब्रीफिंग वस्तुस्थितीला धरून आहे का, ते तपासा

मला कुठल्याही ब्रीफिंगची गरज भासत नाही.मी जनतेत राहतो आणि जनतेच्या प्रश्नांवर काम करतो. मात्र माझ्यावर आरोप करण्यापूर्वी संबंधितांना मिळालेले ब्रीफिंग वस्तुस्थितीला धरून आहे का, याची खात्री करून घ्यावी. चुकीच्या माहितीच्या आधारे विनाकारण डिवचण्याचा प्रयत्न करू नका. मी कोणाच्या वाट्याला जात नाही; मात्र विनाकारण छेडले तर उत्तर द्यायलाही कमी पडणार नाही, असा रोखठोक इशारा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button