जाहिरातबाजीच्या नादात हुतात्म्यांचा अनादर होऊ देऊ नका,”

सोलापूर
भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे हुतात्मा मलप्पा धनशेट्टी, हुतात्मा जगन्नाथ शिंदे, हुतात्मा श्रीकिसन सारडा, हुतात्मा कुर्बान हुसेन तसेच हुतात्मा शंकर शिवदारे हे सोलापूरकरांसाठी प्रेरणास्थान आहेत. या हुतात्म्यांच्या स्मृती जपणाऱ्या बलिदान चौकात जाहिराती व डिजिटल फलक लावून हुतात्मा स्तंभ झाकला जात असल्याने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सोलापूरच्या स्वातंत्र्यलढ्याला देशाच्या इतिहासात विशेष महत्त्व आहे. इंग्रजांविरुद्ध सोलापूरकरांनी केलेल्या प्रखर आंदोलनामुळे सोलापुरात तीन दिवस स्वातंत्र्याचा अनुभव आला. त्यानंतर इंग्रजांनी सोलापूरवर मार्शल लॉ लागू करून आंदोलनातील प्रमुख नेत्यांना अटक केली. स्वातंत्र्यसंग्रामात प्रभावी भूमिका बजावणाऱ्या हुतात्मा मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, श्रीकिसन सारडा आणि कुर्बान हुसेन यांना फाशी देण्यात आली.
या हुतात्म्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ बलिदान चौकाचे नामकरण करण्यात आले असून, तेथे हुतात्मा स्तंभ उभारण्यात आला आहे. मात्र, सध्या विविध राजकीय, सामाजिक कार्यक्रम तसेच शुभेच्छा आणि व्यावसायिक जाहिरातींसाठी मोठमोठे डिजिटल फलक लावले जात असून, त्यामध्ये हुतात्मा स्तंभ झाकला जात असल्याचे निदर्शनास येत आहे.
“जाहिरातबाजीच्या नादात हुतात्म्यांचा अनादर होऊ देऊ नका,” अशी मागणी रयत फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली. बलिदान चौकाला ‘नो डिजिटल झोन’ घोषित करून तेथे कोणत्याही प्रकारचे डिजिटल जाहिरात फलक लावण्यास कायमस्वरूपी प्रतिबंध करावा आणि या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी करणारे निवेदन सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना रयत फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आले.
यावेळी रयत फाऊंडेशनचे शिवराज विभुते, ज्योतिबा गुंड, शिरीष जगदाळे, प्रसाद खोबरे, सतीश वावरे, संभाजी भोसले, शशिकांत पाटील आदी उपस्थित होते.



