दोन हजार विद्यार्थिनींच्या सामूहिक ‘वंदे मातरम’ ने चेतविले राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग
आई प्रतिष्ठानतर्फे साकारला भारताचा मानवी नकाशा : पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती

सोलापूर : प्रतिनिधी
वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आई प्रतिष्ठान आणि दयानंद शिक्षण संस्थेतर्फे शुक्रवारी दोन हजार विद्यार्थिनींनी सामूहिक वंदे मातरम गायन केले. यावेळी दोन हजार विद्यार्थिनींनी दीड एकर जागेत भारताचा मानवी नकाशा साकारला. राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग चेतविणाऱ्या या कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थित राहून ‘वंदे मातरम’ चे गायन करीत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.
दयानंद महाविद्यालयाच्या दीड एकर मैदानावर आई प्रतिष्ठानतर्फे भारताचा १५० बाय १०० फुटांचा मानवी नकाशा साकारण्यात आला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते व्याहारती होम करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे, भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर, छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिकारी डॉ. अग्रजा चिटणीस वरेरकर, आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य ऍड. सुनंदा भगत, सामाजिक कार्यकर्त्या मनीषा चारी- वालेकर, सृष्टी डांगरे, दयानंद शिक्षण संस्थेचे प्रशासक प्रा. डॉ. व्ही. पी. उबाळे, डी. बी. एफ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य बी. एच. दामजी, डी. ए. व्ही. वेलणकर वाणिज्य महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य एस. व्ही. शिंदे, डी. जी. बी. दयानंद विधी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या एस. जे. गायकवाड, डी.पी.बी. दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्र. प्राचार्य एस. बी. क्षीरसागर, दयानंद काशिनाथ असावा प्रशालेचे प्र. मुख्याध्यापक एस. एस. हंपे आदी उपस्थित होते. कलाकार विपुल मिरजकर यांनी दोरीच्या साह्याने भारताचा मानवी नकाशा साकारला.

पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, वंदे मातरम हे गीत भारतातील प्रत्येक नागरिकाला प्रेरणा देणारे गीत आहे. देश प्रेमाची धगधगती ऊर्जा १५० वर्षांनंतरही या गीतातून आजही मिळते. १८७५ साली बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले वंदे मातरम हे गीत स्वातंत्र्ययुद्धाचे राष्ट्रगान बनले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून वंदे मातरम या गीताच्या वैभवशाली वारशाची आठवण देशाला करून दिली. २०४७ साली भारतीयांच्या स्वप्नातील विकसित भारताच्या जडणघडणीत वंदे मातरम हे गीत महत्त्वाचे ठरणार आहे, असेही पालकमंत्री जयकुमार गोरे याप्रसंगी म्हणाले.
या उपक्रमात दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, डी. ए. व्ही. वेलणकर वाणिज्य महाविद्यालय, डी. जी. बी. दयानंद विधी महाविद्यालय, डी.पी.बी. दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशन, दयानंद काशिनाथ असावा प्रशाला, भू. म. पुल्ली कन्या प्रशाला, मार्कंडेय हायस्कूल, सिद्धेश्वर कनिष्ठ महाविद्यालयातील दोन हजार विद्यार्थिनी उत्साहात सहभागी झाल्या होत्या.
आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. मीनाक्षी म्हेत्रे यांनी सूत्रसंचालन तर प्राचार्य डॉ. एस. व्ही. शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी योगेश डांगरे, राहुल डांगरे, विट्ठल बडगंची, पंचाक्षरी स्वामी, शुभम चिट्याल, अविनाश शंकु, सचिन लवटे , नागनाथ कोळेकर, संजय कोळेकर, समर्थ चिलवेरी, लक्ष्मीकांत येलदी, अंबादास पोगुल, उमेश चिट्याल, व्यंकटेश बंडा आदी उपस्थित होते.
————
चौकट
भारतमातांनी वेधले लक्ष
विविध शाळा, महाविद्यालयातील पाच विद्यार्थिनींनी भारतमातेचा वेश परिधान करून, हाती मोठा तिरंगा घेऊन या उपक्रमात हजेरी लावली. भारताच्या मानवी नकाशाच्या मधोमध मोठ्या आकाराच्या कापडी राष्ट्रध्वजासोबत उभे राहून या विद्यार्थिनींनी भारतमातेला वंदन केले.



