महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास नार्वेकरांची मंजुरी – विश्वनाथ चाकोते
वीरशैव महासभेच्या मुंबईतील कार्यक्रमात घोषणा

सोलापूर,(प्रतिनिधी):-
अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेचे महाराष्ट्र शाखेच्या वतीने मुंबईत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी वीरशैव महासभेच्या वतीने मांडण्यात आलेल्या विविध मागण्यावर विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून विधानसभेत महात्मा बसवेश्वर महाराज यांचे तैलचित्र लावण्यास मंजुरी दिली अशी माहिती वीरशैव लिंगायत महासभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जगदगुरू श्री श्री श्री 1008 डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी काशीपीठ यांच्या दिव्य सानिध्यामध्ये मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नाटक राज्याचे कॅबिननेट मंत्री ईश्वर खंडरे यांचा सत्कार तसेच देशभरातील वीरशैव लिंगायत समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या मान्यवरांचा यावेळी माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानसभा अध्यक्ष अॅड.राहुल नार्वेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रारंभी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी प्रास्ताविक केले. अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेच्या कार्याचा आढावा त्यांनी घेतला त्यानंतर त्यांनी वीरशैव लिंगायत समाजाला सकल वीरशैव समाज असे यापुढे संबोधले जावे, महाराष्ट्राच्या विधानसभेत महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र लावण्यात यावे आणि नवी मुंबई परिसरात वीरशैव समाजाला शासनाने 1 एकर जागा द्यावी त्या जागेवर देशभरातून मुंबईत येणार्या वीरशैव समाजाच्या मुलांसाठी तसेच मुंबईमध्ये येणार्या समाजबांधवासाठी राहण्याची सोय व्हावी, महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात वीरशैव समाजाला प्रतिनिधीत्व मिळावे, वीरैशव लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा आणि अल्पसंख्यांकाचा दर्जा मिळावा अशी मागणी करण्यात आली. देशाचे तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सन 2013 मध्ये वीरशैव लिंगायत समाजाला अल्पसंख्याकचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले होते परंतु केंद्रात सरकार बदलले आणि ती मागणी प्रलंबीत राहिली असे आपल्या प्रास्ताविकात विश्वनाथ चाकोते यांनी सांगितले. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संमती देवून लवकरच विधानसभेत महात्मा बसवेश्वर यांचे तैलचित्र लावणार असल्याचे सांगितले.

त्यानंतर कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी राज्यात मंत्रीमंडळात वीरशैव समाजाला प्रतिनिधीत्व देण्याबाबत सकारात्मकता दाखवून दिल्लीला या लवकरच चर्चा घडवून आणून निर्णय घेवू असे सांगितले. त्यानंतर केएलईचे कुलगुरू डॉ.प्रभाकर कोरे यांना वीरशैवरत्न, बसव समितीचे अरविंद जत्ती यांना बसवरत्न, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना वीरशैव भुषण, बीदरचे माजी आमदार अशोक केनी यांना पंचाचार्य रत्न, पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष हभप गहणीनाथ औसेकर महाराज यांना विठ्ठल सेवा पुरस्कार, कलबुर्गीचे शरणबसवेश्वर विद्यावर्धक संघाच्या चेअर पर्सन डॉ.दाक्षायणी अव्वाजी यांना अक्कमहादेवी रत्न, उपमुख्यमंत्री एकनाि शिंदे यांचे स्वीयसहाय्यक मंगेश चिवटे यांना वीरशैव आरोग्य दूत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर वीरशैव समाजातील वीरशैव कक्कय्या समाजाचे अध्यक्ष सुधीर खरटमल, यांच्यासह कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र राज्यातील मंत्री, आमदार, खासदार माजी आमदार खासदार विविध पदाधिकारी यांचा वीरशैवश्री या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला संपूर्ण देशभरातून वीरशैव बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेचे अध्यक्ष कर्नाटक राज्याचे मंत्री ईश्वर खंडरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विश्वनाथ चाकोते, महिला अध्यक्षा उमा नाईक, मुंबई अध्यक्ष महेश मुद्दा, कर्नाटक प्रदेश अध्यक्ष शंकर बीद्री, तेलंगणा अध्यक्ष नेती महेश्वर, तामीळनाडूचे अध्यक्ष एस नागराथीनम, आंध्रप्रदेशचे अध्यक्ष दांडीना शिवानंद, केरळचे अध्यक्ष बीन के शंकर, महिला अध्यक्ष वीणा कश्यपनवर, उद्योग विभागाचे अध्यक्ष उमेश शिगोन, युवा अध्यक्ष व्यंकट रेड्डी पाटील, महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष विश्वशंकर चाकोते, रोहिणी कल्याणी, गुणवंत पाटील, गुरूपादप्पा पदशेट्टी, प्रकाश गवळी, प्रविण संगोलगी, सुरेश पाटील, सुभाषप्पा बोंदरे, चंद्रकांत नागणसुरे, अनिल चौगुले, शिवराज शेटकर आदींनी परिश्रम घेतले.
…………………………………



